घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबईकर मराठी चेहरा दिसत नाही!

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबईकर मराठी चेहरा दिसत नाही!

Subscribe

मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, गजानन कीर्तिकर तसेच माझगाव येथून छगन भुजबळांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर यांच्याकडे मंत्रीपद सोपविले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला. शिंदे गट आणि भाजप या दोघांकडून प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात महिलांना संधी मिळाली नाही यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पण मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि मुंबईतील मराठी चेहर्‍याला प्रतिनिधित्वच दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसेना आणि भाजप युतीने १९९५मध्ये पहिल्यांदाच राज्यातील सत्ता काबिज केली. त्यात सर्व विभागांचा समतोल साधताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले होते. मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, गजानन कीर्तिकर तसेच माझगाव येथून छगन भुजबळांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर यांच्याकडे मंत्रीपद सोपविले होते.

- Advertisement -

तर भाजपने दत्ता राणे, राज पुरोहित यांच्या माध्यमातून मुंबईला प्रतिनिधित्व दिले. तर २०१४मधील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना मंत्रिमंडळात विनोद तावडे, अ‍ॅड. आशिष शेलार, प्रकाश मेहता, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, विद्या ठाकूर, रवींद्र वायकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करून मुंबईला महत्त्वाचे स्थान दिले होते.

यावेळी मात्र चित्र याच्या विपरीत आहे. संजय राठोड व सुधीर मुनगंटीवार (विदर्भ); गुलाबराव पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन आणि विजयकुमार गावित (उत्तर महाराष्ट्र); अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे व तानाजी सावंत (मराठवाडा); चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे-पाटील व सुरेश खाडे (नगर,पश्चिम महाराष्ट्र); उदय सामंत व दीपक केसरकर (कोकण), तर रवींद्र चव्हाण (डोंबिवली) यांचा तर मुंबईतून केवळ भाजप आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रिमंडळात दिसत आहेत.

- Advertisement -

शिंदे गट आणि भाजपकडे सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, पराग अळवणी, अतुल भातखळकर, योगेश सागर, विद्या ठाकूर, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी हे मुंबईचे आमदार असतानाही यापैकी एकालाही संधी दिली नाही. एकीकडे मुंबई महानगरीतून मुंबईचा टक्का घटत असताना मराठी चेहर्‍याला संधी देण्याऐवजी मंगलप्रभात लोढा (मारवाडी जैन) यांना भाजपने संधी दिली आहे. सलग ६ वेळा आमदार राहणार्‍या मंगलप्रभात लोढा यांना तसे पाहिले तर उशिरानेच संधी मिळाली आहे, पण त्यांच्याबरोबर भाजपने अ‍ॅड. आशिष शेलार, राम कदम तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे आणि मुंबईतील एकमेव महिला आमदार यामिनी जाधव यांच्यापैकी एकाला संधी दिली असती तर मुंबईला न्याय मिळाला असता,अशी चर्चा आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -