आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. सोमवारी म्हणजे ११ मार्चला या नावांची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसच्या छाननी समितीच्या महत्वाच्या बैठकित महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
उमेदवारी निश्चित झालेले उमेदवार
सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
सांगली – प्रतिक पाटील
यवतमाळ – माणिकराव ठाकरे
नांदेड – अमिता चव्हाण
हिंगोली – राजीव सातव
नागपूर- नाना पटोले
उत्तर पश्चिम मुंबई – संजय निरुपम
दोन जागांचा तिढा कायम
दरम्यान, दिल्लीत झालेल्या बैठकीतही औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरचा तिढा कायम असून, लवकरच याचाही निर्णय होईल अशी माहिती मिळत आहे. काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरची जागा मागितली असून राधाकृष्ण विखे – पाटील यांचे पुत्र सुजय विखे – पाटील नगरच्या जागेवरून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. पण, राष्ट्रवादी मात्र नगरची जागा सोडण्यासाठी उत्सुक नसल्याने या जागेचा पेच कायम आहे.
पवारांच्या घरी बैठक पार
दरम्यान, एकीकडे काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही शरद पवार यांच्या घरी उशिरापर्यंत बैठक पार पडली. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक बैठकीला हजर होते. कल्याण, ठाणे, नगर, औरंगाबाद, अमरावती आणि रावेर या जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.