कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या तिलारीनजीक काल सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात बेळगावच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तिलारीनजीक असणाऱ्या कोदाळी घाटात हा अपघात झालेला असून वॅगनॅार गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे पाच जणांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. वर्षा सहलीचा आनंद लुटायला आलेल्या पाच तरुणांवर काळाने घाला घातला असून पाचही तरुण हे बेळगावचे रहिवासी आहेत.
काही दिवसांपूर्वी याच लष्कर पाँईंटवरुन हेरे प्राथमिक रुग्णालयाची रुग्णवाहीका कोसळली होती. या घटनेनंतर ही दुसरी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये मोहन लक्ष्मण रेडकर, कृष्ण मुकुंद गावडे, यल्लाप्पा एन पाटील, पंकज उर्फ जोतिर्लिंग संपत तेवेकर आणि नागेंद्र शिदाप्पा गावडे यांचा समावेश आहे. हे सगळे तरुण बेळगावचे रहिवासी आहेत. काल रात्री उशीरापर्यंत खोल दरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरु होते. शवविच्छेदनासाठी जवळच असणाऱ्या चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह पाठविण्यात आले आहेत.
घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर आंबोली पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. काल बेळगाववरुन हे पाचही तरुण सहलीचा आनंद घेण्यासाठी आपल्या वॅगनआर गाडीतून आले होते. पण गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी सुमारे अडीचशे फूट खोल दरीत कोसळली यामध्ये पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.