राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याचे समोर येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. जबाब नोंदवण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने कार्यालयात येण्याची विनंती केली आहे. मात्र समन्ससाठी सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यापूर्वी व्हीसीद्वारे एकदा या अधिकाऱ्यांनी सीबीआयबरोबर चर्चा केली होती. दरम्यान राज्याच्या या दोन प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आल्याची अधिकृत माहिती अजूनपर्यंत सीबीआयकडून जारी करण्यात आली नाही आहे. परंतु थोड्याच वेळात सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी केव्हा आणि किती वाजता चौकशीसाठी उपस्थितीत राहण्याचे आहे, याबाबतची माहिती सीबीआयकडून दिली जाणार आहे.
माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसूली प्रकरणात हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीबीआयने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थितीत राहण्यास नकार दिला आहे. जर काही माहिती हवी असेल तर सीबीआयने त्यांनी त्यांच्याकडे यावं, असं सीबीआयला कळवण्यात आलं आहे.
याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, ‘आज नाहीतर, उद्या नाहीतर, परवा नाहीतर, तेरवा. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दोघांनीही सीबीआयला सांगितलं आहे की, तुम्ही सगळ्या पैलूंची चौकशी करायची आहे. मग त्यामध्ये फोन टॅपिंग, १०० कोटींची वसूली, मनसूख हिरेन हत्या प्रकरण आणि मनी लाँड्रिंग पण येणार आहे. त्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी सहकार्य करावं आणि माहिती द्यावी. कोणालाही समन्स बजावला म्हणजे तो गुन्हेगार झाला असं नाही. संबंधित व्यक्तीजवळ जी माहिती आहे ती द्यावी लागते. त्याच्या आधारे तपास यंत्रणा योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते.’