घरठाणेगर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, स्वतंत्र ठाणे स्थानकाबाबत करणार नियोजन

गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, स्वतंत्र ठाणे स्थानकाबाबत करणार नियोजन

Subscribe

लोकल ट्रेनला मुंबईची लाइफलाइन असं म्हटलं जातं. लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात. मुंबईसह दादर, ठाणे, कल्याण यांसारख्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची अफाट गर्दी दिसून येते. मुख्यत्वे पश्चिम रेल्वे मार्गिकेपेक्षा मध्य रेल्वेवर प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येते. यासाठी भारतीय रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या ठाणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा पूर्णपणे बदलणार आहे.

ठाणे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी मध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. स्लो लोकलसाठी एक स्वतंत्र असं स्थानक उभारण्याचं नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. खासगी वाहनधारकांना ठाणे स्थानकात पोहोचताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मध्य रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानक उभारण्यात येणार आहे. मनोरुग्णालयाची एकूण जागा ६ हेक्टर असून, यापैकी १.३ हेक्टर जागेत नव्या स्थानकाची उभारणी होणार आहे. नव्या ठाणे स्थानकामध्ये होम फलाटासह दुतर्फा तीन फलाट असतील. स्थानकात तीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, यापैकी दोन पुलांची जोडणी फलाटांना आणि एका पुलाची जोडणी पूर्व-पश्चिम असेल. त्यासोबतच सरकते जिने, लिफ्ट या आधुनिक सुविधा फलाटांवर असणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड स्थानकातून दररोज ८०० हून अधिक लोकल फेऱ्या होतात. ठाण्यातून हार्बर, मुख्य आणि मेल-एक्स्प्रेससह एकूण १ हजार ३०० हून अधिक रेल्वे फेऱ्यांची हाताळणी होते. यामुळे नव्या ठाणे स्थानकात सध्याच्या ठाणे स्थानकातील धीम्या लोकल वळवून प्रवासी गर्दी विभागण्यात येणार आहे. जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सध्याच्या ठाणे स्थानकातूनच चालवण्याचे नियोजन आहे. परंतु नव्या स्थानकासाठी अपेक्षित खर्च १८३ कोटी रुपये असून ठाणे स्मार्ट शहरांतर्गत स्थानक आणि परिसरासाठी २८९ कोटींची तरतूद आहे. तसेच हा संपूर्ण खर्च ठाणे महापालिकेकडून मध्य रेल्वेला देण्यात येणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून मनोरुग्णालयाची जमीन आणि ठाणे महापालिकेकडून निधीचा पहिला टप्पा वितरीत झाल्यावर रेल्वेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षांमध्ये या स्थानकाचे काम पूर्ण करण्यात येणार असून प्रवासी वाहतुकीसाठी नवे स्थानक खुले होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचा जुहू समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -