महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच शिवसेना नक्की कुणाची?, याबाबतची न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. शिवसेनेचे दोनच नव्हे तर मराठवाड्यातील 80 टक्के जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा, मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे, दरम्यान, शिंदे गटाचे 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचं भुमरे एका गावठी सभेत ते बोलले, ज्यात फक्त 25 ते 30 लोकं होते. बाकी सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. पण त्यांना हे माहित नाही की, शिंदे गटातील 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत.
हे आमदार फक्त मातोश्रीच्याच नाही तर नेत्यांच्या म्हणजेच आमच्याही संपर्कात आहे. ते आम्हाला भेटतात सुद्धा. आपण उद्धव ठाकरेंना उगाच सोडले असे आता त्या आमदारांना वाटत आहे, असं चंद्रकात खैरे म्हणाले.
शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. काहींना मनासारखे खाते मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांना वाटत आहे की, आपण मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडायला नको पाहिजे होतं. तसेच 16 आमदारांच्याबाबतीत कधीही न्यायालयातून निकाल आल्यास सरकार पडेल त्यानंतर पुढे काय? असा सवाल खैरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा : दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ, मुंबई दूध उत्पादक महासंघाचा निर्णय