भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सर्वपक्षीय बैठकीमध्ये भाजपचं कोणीही नव्हतं, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही बैठकीमध्ये जाणार नाही. कारण सर्वपक्षीय बैठकीचा अर्थ म्हणजे सर्वांनी एकत्र बसून, चर्चा करून एकत्रितपणे निर्णय घेतला जातो. पण महाविकास आघाडीने असं काही वातावरण ठेवलेलं नाहीये. म्हणजे लाथ मारायची आणि माफी मागायची, अशा प्रकारची वृत्ती ही महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे या आघाडीला जे काही करायचं आहे ते करूदे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
बैठकीत काही गंभीरपणा दिसणं महत्वाचं आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्यांच्या शब्दाला वजन आहे यांच्यासारखे नेते जर बैठकीला उपस्थित नसतील तर अवघड आहे. कारण गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेमध्ये आणि मुंबईतील काही निर्णयांमध्ये अधिकार आहेत. मुंबईत जे काही चाललंय ते मातोश्रीवरून चालतं, वळसे पाटील हे बिचारे आहेत. त्यामुळे ज्या बैठकीत काही निर्णय होणार नाही. त्या बैठकीला जाऊन काहीच फायदा होणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत वक्तव्य करताना पाटील म्हणाले की, फुटेज तपासल्यानंतरच पोलीस या निष्कर्षाशावर आलेले आहेत. ही घटना पोलिसांच्या समोरच घडली. सीसीटीव्ही फुटेज हे एक यंत्र आहे. खेटून आणि रेटून बोलणं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची सवयच झालेली आहे. त्याचप्रमाणे ते करताहेत आणि प्रत्येक विषयात ते करत आहेत. भारतीय जनता पार्टी आपल्यापद्धतीने लोकांमध्ये प्रबोधन करत आहे. पोलखोल यात्रा जोरात सुरू आहे. मुंबईत जवळपास १५० च्या वर पोलखोल सभा या पूर्ण झालेल्या आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा : नवनीत राणांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांनी घेतली दखल, २४ तासांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश