सांगली, कोल्हापूरसह पूरबाधित भागातील या वर्षी होणाऱ्या मुलींचे विवाह करण्यास सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे पूरग्रस्त भागातील बाधित जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या चर्चेनंतर ते बोलत होते. पूरग्रस्त भागातील आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक माता-पितांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून महाराष्ट्रतील सर्व दानशूर व्यक्तींनी मदत करुन या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन चंद्राकांत पाटील यांनी केले आहे.
सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. आता पूर ओसरला असला तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा आणि सर्वस्व गमावलेल्या पालकांसमोर आपल्या मुलींचे विवाह कसे करायचे, असा प्रश्नही निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा मुद्दा मांडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता, पालकत्वाची भूमिका निभावत यावर्षी ज्या मुलींचे विवाह होणार आहेत अशा सर्व मुलीच्या विवाहासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याबाबत महसूलमंत्र्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महापुरामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे उध्वस्त झाले आहे. यावर्षी या पूरग्रस्त गावांमध्ये त्यातल्या आई वडिलांना खर्च करणे शक्य नसतील अशा कुटुंबातील मुलींचे दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने पूर्ण लग्नाचा खर्च पुणे व कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने करणार असल्याचा संकल्प केला असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.