भाजपचे विद्यमान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगळप्रभात लोढा यांची त्या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्य आणि मुंबई अध्यक्षपदी नवीन नियुक्ती होण्याची चर्चा होती. विशेषत: २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंगलप्रभात लोढा यांच्याजागी आशिष शेलार किंवा मनोज कोटक यांच्यासारखं तरुण आणि आक्रमक नेतृत्व नेमलं जाण्याची देखील जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अखेर मंगलप्रभात लोढा यांचीच पुन्हा त्या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली होती. पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे किंवा गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होती.
Chandrakant Patil to continue as Maharashtra BJP president, Mangal Prabhat Lodha to be the BJP Mumbai president. pic.twitter.com/hsbtkXvfhK
— ANI (@ANI) February 13, 2020
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी १६ जुलै २०१९ रोजी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील कायम आहेत. त्यांच्यासोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांची तेव्हाच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सोडला होता. तेव्हापासून मंगलप्रभात लोढा हे मुंबई भाजप अध्यक्षपदी आहेत.