मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या १६ जूनला कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तसेच ३६ जिल्ह्यांत मराठा मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय संभाजीराजेंनी मराठा मोर्चाबाबत चालढकल केल्यास माराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. यामुळे राज्य सरकारला पळवाट मिळेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी धोरण स्पष्ट करावे. सभाजीराजे यांनी चालढकल केल्यास जो कोणी मराठा आरक्षणासाठी नेतृत्व करेल त्यांच्या पाठीशी भाजप असेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे मोर्चा काढणार असल्याचे विचारण्यात आले. मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चा काढण्याबाबत संभाजीराजेंनी चालढकल केली तर ती जनतेच्या ध्यानात येईल इतपत जनता सुज्ञ आहे. असे झाल्यास मराठा आरक्षणाच्या मोर्चाचे नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल तोपर्यंत राज्य सरकारला वेळ मिळेल आणि यामुळे मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. तसेच चालढकल झाल्यास राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट मिळेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
संभाजीराजेंनी गोष्टी स्पष्ट कराव्या
मराठा मोर्चावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोर्चाबाबतच्या गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे. ते एकदा मोर्चा काढणार, एकदा लॉंग मार्च काढणार, मुक मोर्चा काढणार असे म्हणत आहेत. कोल्हापुरातून १६ जूनला मोर्चा निघणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संभाजीराजेंनी नीटपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. संभाजीराजे यांनी रायगडावर घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु त्यांना माघार घेतली तर भाजपची तीच भूमिका राहणार आहे. तसेच मराठा मोर्चाचे दुसऱ्या कोणी नेतृत्व केलं तर त्यांनाही भाजप पाठिंबा देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.