राज्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत भाष्य केले तसेच लॉकडाऊनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजबाबतही माहिती दिली होती. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसीवीर आणि व्हेंटिलेटवरुन राजकारण सुरु आहे. सत्ताधारी केंद्र सरकारवर सतत टीका करत असताना सर्व काही केंद्रावर ढकलणार असाल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधल्यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ऑक्सिजन पुरवठा, लस, रेमडेसिवीर अशा प्रत्येक गोष्टी केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाविरोधात लढा देताना सर्व काही केंद्र सरकारने करायचे असेल तर राज्य सरकार स्वतः काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
राज्यात कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येणार याबाबत राज्य सरकारला ५ महिन्यांपूर्वीच माहित होते. मग राज्य सरकारने पुर्वतयारी का केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दुसरी लाट येणार असल्याचे कबूल केले होते. परंतु राज्य सरकारने काय तयारी केली हे सांगितले नाही. येत्या काही दिवसांत रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. हे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे झाले आहे. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुर्वीच अशी व्यवस्था करण्यास सुरुवात केली असती तर आता अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
केंद्र सरकारने राज्याला ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. यामुळे राज्यातील गरज जेमतेम भागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात आहे. हे सुद्धा चांगले झाले असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. लसीकरणावरुन चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे की, राज्यातील २८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एकरकमी १२ कोटी लस घेण्याची तयारी दाखवली आहे. लसीची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना राज्य सरकार केंद्राच्या मागे लपत आङे. लसीचा पुरवठा मिळेल तसेच लसीकरण करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरुणांसाठी जशी नोंदणीनंतर संदेश आल्यानंतरच लस दिले जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे केले असते तर आता घडणारी परिस्थिती किंवा गोंधळ उडाला नसता. ज्येष्ठ नागरिकांना उन्हात मनस्ताप सहन करावा लागला नसता असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.