नाशिक – शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपकडे महत्त्वाची खाती असल्याने शिंदे गटात अस्थिरता निर्माण झाली आहे. शिंदे गटातील ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे काही मंत्री अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सत्तेसाठी आलो नाही म्हणता, मग आता रडता कशाला?, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अखेर खाते वाटप झालं आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री असल्यामुळे मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे, असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?, अशी टीका छगन भुजबळ यांनी शिंदे गटावर केली आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाले असले तरी टिळक, गांधी, नेहरू, बोस, सावरकर यांनी बलिदान दिले. अनेकांनी काळ्या पाण्याची सजा भोगली. पंडित नेहरू ११ वर्ष जेलमध्ये राहिले. प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी लढले. पुस्तकांमध्ये काही ठिकाणी पंडित नेहरूंचे चित्र छपायचे का नाही याबाबत चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदेंना फोन केल्यावर ते जय महाराष्ट्र बोलतात. मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, असं छगन भुजबळ म्हणाले. मंत्री झाल्यावर आदेश काढला. पण या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काहीच कारण नाही. काही जण जय हिंद बोलतात, काही जय महाराष्ट्र बोलतात. आमचे पोलीस बांधव जय हिंद म्हणतात. तर शिवसेनेची लोकं जय महाराष्ट्र म्हणतात, असं भुजबळ म्हणाले.
संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या देशात आपण स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून ज्या स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारकांनी व ज्ञात ,अज्ञात अशा अनेकांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान केलेल्या सर्वांची आपण जाणीव ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.