नाशिक : शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबद्दल केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. कामाख्या देवीला कापलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंगे वर्षा बंगल्याच्या परिसरात मुख्यमंत्रिपद कुणाकडे टीकू नये म्हणून पुरण्यात आली आहेत. अशी वर्षा बंगल्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले. राऊत यांनी नव्या विधानानं चर्चांना उधाण आले आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबद्दल केलेल्या दाव्याबद्दल प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळांना हसू आवरेना. नंतर हात जोडून भुजबळांनी अधिक बोलणे टाळले.
हसत-हसत भुजबळ म्हणाले, “मी काय सांगू शकत नाही. कुणी शिंग तिथे पुरले आहेत, ते काढा म्हणावे बाहेर… कुणी पुरले असतील, तर एकटे पुरू शकणार नाही, त्यासाठी 10 ते 20 माणसे लागले असतील. परंतु, मला अधिक माहिती नाही.” असं म्हणत भुजबळांनी हात जोडले आणि अधिक बोलणे टाळले.
संजय राऊतांचा दावा काय?
“देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी का जात नाहीत, हा मारूती कांबळेचं काय झाले? यासारखा आमचा प्रश्न आहे. शपथविधी होऊन इतके महिने झाले, पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत? मी असे ऐकलंय की, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय, ‘राहायला गेलो, तरी वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी जाणार नाही.’ म्हणजे हा काय प्रकार आहे? अवघ्या महाराष्ट्राला याची काळजी लागली आहे,” असं राऊतांनी म्हटले.
“शिंदे गटात सगळे लिंबू-मिर्ची सम्राट आहेत. भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चा आहे की, ‘वर्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या बागेत खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत.’ आम्ही काय अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माननारे लोक आहोत. पण, कुणाकडेही मुख्यमंत्रिपदू टीकू नये म्हणून कामाख्या देवीला कापले गेलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंगे वर्षा बंगल्याच्या परिसरात पुरण्यात आली, अशी चर्चा तेथील कर्मचाऱ्यांमध्ये आहे,” असं राऊतांनी म्हटले.