महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळांनी आज प्रथमच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया व्यक्त केली. जनता फक्त मतपेटीतून बोलत असते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं. खूप दिवस तुम्ही लोकांना मुर्ख बनवू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. सोमय्यांचं नाव न घेता ते म्हटले की, कुणी कुठेही जावं, आम्ही उजळ माथ्यानेच बाहेर येऊ.
पत्रकार परिषदेत भुजबळ पुढे म्हणाले की, असंख्य लोक निराधार आरोप करत असतात. मात्र, जनता पाठीशी असल्याने आणि त्यांचे आशीर्वाद सोबत असल्याने आपण निर्दोष सुटलो. काही लोक दुखावतात आणि सत्तेचा गैरवापर करायला सुरुवात करतात. मात्र, राजकारणात टिकायचं असेल तर सहनशक्ती असावी लागते. ज्याप्रमाणे हार गळ्यात पडण्याची अनुभूती तुम्ही घेता, त्याचप्रमाणे प्रहारदेखील झेलण्याची क्षमता असावी लागते. जनतेला सगळं समजतंय. सदा सर्वदा तुम्ही लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत. केंद्राच्या माध्यमातून चाललेले प्रकार अवर्णनीय आहेत. तुम्ही सरळ वागताय की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार काही विरोधकांना वापरता येणार नाही, असा टोलाही भुजबळांनी लगावला.
गॅस किती स्वस्त झाला, पेट्रोल किती स्वस्त झालं, हे सर्व लोकांना समजतंय. राष्ट्राची संपत्ती कशी वाढतेय, काय विकलं जातंय हेही माहितेय. दोन लोक विकण्याचं दोन लोक घेण्याचं काम करताहेत. जनता सब जानती है. जनता मतदानाच्या पेटीतून बोलत असते. कोण कसं वागलं हे विचार करते. शेवटी त्यांनी, जबाव देने का हक मैने वक्त को दे ऱखा है..या अंदाजात आपल्या भावना व्यक्त केल्या.