मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली. याच पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बोलत असताना त्यांनी बाळसाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘स्वतः बाळासाहेब ठाकरे बोलले होते, भुजबळ जर गेले नसते तर ते शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळेस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री झालो असतो.’
नक्की काय म्हणाले भुजबळ?
‘मुख्यमंत्री झालो नाही याची मला अजिबात खंत वाटत नाही. स्वतः बाळासाहेब बोलले होते की, जर भुजबळ गेले नसते तर मुख्यमंत्री झाले नसते. त्यामुळे अर्थात बाळासाहेब म्हणाले म्हणून मी मुख्यमंत्री झालोही असतो. कारण १९८५ साली विधानसभेची निवडणूक शिवसेनेचा मी एकटाच निवडून आलो होतो, सर्व जण पराभूत झाले होते. त्यामुळे महापौर, आमदार आणि ऑल इंडिया मेअर कौउन्सिलचा अध्यक्ष पण मी होतो. हा सगळा इतिहास झाला. बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांनी आमदार असतानाही मला नगरसेवक पदासाठी उभं केलं. त्यानंतर त्यांनी मला महापौर पद दिलं. त्यामुळे ते संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही’, असे भुजबळ म्हणाले.
ओबीसीच्या राजकारणामुळे शिवसेना सोडली
पुढे भुजबळ म्हणाले की, ‘दरम्यान ज्यावेळेस काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. त्यावेळेस शिवसेना-भाजप सरकारवर तुटून पडलो होती. माझ्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता. माझ्यावर केस टाकल्या होत्या. माझ्या डोक्यावर प्रकरण थोपवण्याच्या त्यांचा कट होता. त्यावेळेस मी शिवसेना-भाजपसोबत लढत होतो. काँग्रेसचं विभाजन नव्हतं झालं. तेव्हा मुख्यमंत्री कोण असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, आणखीन कोण असणार भुजबळ मुख्यमंत्री असणार. नंतर काँग्रेसमधून शरह पवार बाहेर आले. त्याच्यासोबत मी देखील बाहेर पडलो. पवार साहेबांसोबत राहिलो. अनेकांचे फोन आले पुढचा मुख्यमंत्री बनवतो. तसेच मी ओबीसीच्या राजकारणामुळे शिवसेना सोडली आणि पवार साहेबांचा हात धरला. पवार साहेबांना आमच्या मागण्या पूर्ण केल्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गने आम्ही जातो आहोत. त्यामुळे ठिक आहे, जे मिळत त्यात मी खूश आहे.’
‘ज्यावेळेला ही आमची लढाई चालू होती. त्यावेळेस विलासराव देशमुख आहेत, त्याचा विधानपरिषदेत आणि विधानसभेत पराभव झाला होता. या लढाईत ते नव्हते. त्यामुळे या लढाईत मीच पुढे होतो. मी सरकारवर हल्ले करायचो, सरकार माझ्यावर हल्ला करायचे. त्यावेळेस निवडणुकीच्या वेळी अर्थात आमचा पक्ष नवीन, आम्ही प्रचाराला निघालो. पवारांनी आणि आम्ही उमेदवार जाहीर केले. काही जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाची यंत्रणा नव्हती. जिल्हाध्यक्षसुद्धा एनसीपीची होते. तरी सुद्धा आम्ही आणि पवारसाहेब लढलो. त्या निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने पुढे आलो. परंतु आमच्या पाच ते सात विधानसभेच्या जागा आहेत, काँग्रेसपेक्षा कमी मिळाल्या. त्यावेळेस आम्ही लक्षात घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभागले आहेत आणि वेगवेगळे लढले तरी दोघांची एवढी बेरीज आहे की, शिवसेनेपेक्षा जास्त आहे. आम्ही म्हटलं ठिक आहे, ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो म्हणजेच शिवसेना आणि भाजपच्या विरोधात जनतेने जनादेश दिला आहे. त्यामुळे पवार साहेब आणि आम्ही काँग्रेससोबत समझोता केला. त्याचे पाच ते सहा आमदार जास्त होते, म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. म्हणून पवार साहेबांनी पक्षासाठी जे सर्वश्रेष्ठ पद महत्त्वाचं होत ते म्हणजे मुख्यमंत्री ते मला दिलं,’ असे भुजबळांनी सांगितले.
हेही वाचा – राज ठाकरे, राणेंना पक्षातून का बाहेर जाव लागल? CM पदावरून उद्धव ठाकरेंना