औरंगाबाद: औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात काही कैद्यांनी एकत्र येऊन तुरुंगाधिकाऱ्यासह कारागृहातील कर्मचाऱ्यांवर जीवघेणार हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अधिकारी कारागृहात कैद्यांची झडती घेत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर 9 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर, अमित चंद्रकांत गुरव आणि सुमंत सूर्यभान मोराळे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Aurangabad Harsul Jail inmates attack officers staff in film style Filed a case)
‘या’ नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
शाहरुख अकबर शेख (वय 30), सतिश खंदारे (30), गजेंद्र ऊर्फ दादा तुळशीराम मोरे (42), निखील गरज (25), किरण साळवे (22), ऋषीकेश तनपुरे (25), अनिल शिवाजी गडवे (25), अनिकेत दाभाडे (22), राज जाधव (26), अशी आरोपींची नावं आहेत.
हल्ला करण्याचं कारण काय?
27 ऑगस्टला प्रवीण रामचंद्र मोडकर हे तुरुंग अधिकारी कैद्यांची झडती घेत होते. ज्यात कारागृहातील बंद्या जवळ काही अवैध वस्तू शोधणं. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं अशी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. सकाळी 8 च्या सुमारास झडती ड्यूटी सुरू असतानाच एका कैद्यानं येऊन शाहरुख अकबर शेख हा कैदी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा प्रमउख अधिकारी सतिश हिरेकर यांनी चौकशीसाठी त्याला बोलावून घेतलं. शाहरुखची चौकशी सुरू असतानाच तो जोरजोरात ओरडू लागला. तसंच, तक्रार करणाऱ्या दुसऱ्या कैद्याला थेट मारहाण करू लागला. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
सगळे अधिकारी आणि कर्मचारी वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच शाहरुखने तुरुंगाधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर यांच्या गळ्याला पकडून पायात पाय घालून खाली पाडलं आणि त्यांना लाथाबुक्यानं मारहाण सुरू केली. त्याचदरम्यान बॅरेक क्रमांक 01 मधले काही कैदी बॅरेकचा दरवाजा जोरात ढकलून बाहेर आले. यातील गजेंद्र मोरे यानं या भांडणात येऊन इतर कैद्यांना चिथावलं आणि अधिकारी , कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे मग इतर सर्व आरोपींनी मिळून तुरूंगाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आता याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा: अजित पवारांचा निर्णय विकासासाठी, ‘इंडिया’ आघाडीनेही घेतली दखल; सुनील तटकरेंचा हल्लाबोल )