छत्रपती संभाजीनगर : मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील हे काँग्रेस नेते, विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. थेट एकेरी येत जरांगे-पाटील यांनी वडेट्टीवार यांना सुनावले आहे. याला कारण ठरले वडेट्टीवार यांनी केलेले एक वक्तव्य. जरांगे-पाटलांनी सगळीकडे बोलायची गरज नाही, असं विधान वडेट्टीवार यांनी केले होते. यानंतर जरांगे-पाटील संतापले. तू काय ठेका घेतला का सगळ्यांवर बोलायचा आम्ही बोलायचं नाही का? असा सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?
“प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांना बोलायचे गरज नाही. मात्र, ते प्रत्येक ठिकाणी येतात. सुरेश धस यांची भूमिका संतुलित दिसते. एखाद्या घटनेला समाजावर नेणे चूक आहे,” असं वडेट्टीवार यांनी म्हटले होते.
हेही वाचा : जरांगे-पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांना वॉर्निंग; म्हणाले, ‘संयम सुटला तर मी…’
तू काय ठेका घेतला का सगळ्यांवर बोलायचा…
याबद्दल जरांगे-पाटील यांना प्रश्न विचारल्यावर ते चिडले. “मग तुम्हाला सगळे ओरबडण्यासाठी ठेवायचे का? आम्ही काही बोलायचे नाही का? ते काही बिचळले की काय? मागेही बोलले होते, तेव्हा मी काय हेंद्र्याला बोललो होतो का? परत मी बोललल्यावर राग येतो. तुझा उद्योग बघ ना… तू काय ठेका घेतला का सगळ्यांवर बोलायचा; आम्ही बोलायचं नाही का? तू कोण लागून गेला? गरीब शेतकरी, मराठे, ओबीसी आणि मुस्लिमांच्या बाजूने बोलायचे नाही का?” असा सवाल जरांगे-पाटील यांनी वडेट्टीवार यांना विचारला आहे.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड भेटले…
जरांगे-पाटील म्हणाले, “अनेक नेते, अंतरवाली सराटी येथे मला भेटण्यासाठी मला येत होते. मी रात्रंदिवस त्यांना भेटायचो, सन्मान करायचो. कधीही दुजाभाव केला नाही. अंतरवाली सराटी येथे भेटण्यासाठी यायचे म्हणून 8 दिवसांपासून मुंडेंकडून निरोप येत होता. रात्री 2 वाजता मला भेटायला आले होते.”
“धनंजय मुंडे आणि सरमाडा ( वाल्मिक कराड ) दोघेजण आले होते. धनंजय मुंडेंनी सरमाड्याची ओळख करून दिली. मी म्हटले, ‘हे आहे का, हार्वेस्टरचा पैसे बुडवणारा?’ त्यानंतर, ‘सहकार्य करा, लक्ष ठेवा. निवडणुकीचा काळ आहे. माझ्यावर अन्याय झाल्यावर मराठ्यांनी मला मोठे केले,’ असं धनंजय मुंडेंनी म्हटलं,” अशी माहिती जरांगे-पाटील यांनी दिली.
धनंजय मुंडे पाया पडले होते का? असा प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “काही राजकीय आणि सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. ते संकेत पाळणारा मी आहे. जिथे अन्याय झाला, तिथे लागेल त्या ताकदीने भिडण्याची माझी तयारी आहे. परंतु, काहींच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मात्र, ती प्रक्रियाच आहे, तेव्हाच्या वेळेची…”
हेही वाचा : अर्थसंकल्पादिवशी मोदींनी जोरजोरात बाक वाजवण्यावरून राऊतांचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांना…’