घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीच्या पिंजर्‍यात

मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीच्या पिंजर्‍यात

Subscribe

सध्या महाराष्ट्रात अधिकार्‍यांचेच राज्य, मुख्यमंत्री मंत्रालयात येतच नाहीत, लॉकडाऊनशिवाय काहीच बोलत नाहीत

राज्यातील सध्याची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या चार महिन्यांत राज्य १० वर्षे मागे गेले आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद आहे तो ‘मातोश्री’च्या पिंजर्‍यात बसला आहे.‘मातोश्री ’पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर मुख्यमंत्री तिथून बाहेर येत नाहीत आणि बाहेर आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रिय सरकार सत्तेत राहणे राज्याच्या हिताचे नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे, राज पुरोहित उपस्थित होते. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत ५ हजारांवर तर राज्यात ८ हजारांवर बळी गेले आहेत. ही स्थिती असतानाही सरकार जराही गंभीर नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न हाताळले जात नाहीत. राज्याच्या मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच बसत नाहीत. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जातो. हे असेच चालणार असेल तर ज्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय केले होते ते बदलून पुन्हा एकदा सचिवालय करावे, असा टोला राणे यांनी लगावला.

- Advertisement -

लॉकडाऊन कधीपर्यंत?
मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचा पुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन करायला हवे पण कुठपर्यंत तेही ठरवायला हवे. लॉकडाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न उभे राहत आहेत. कोरोनाचे रुग्णही कमी होत नाहीत. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. मुंबईसारख्या शहरात रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकर्‍याला बोगस बियाणे देऊन फसवले जात आहे. कोकणात चक्रीवादळ आले तिथे मदतीचा एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अजून पंचनामेही केले गेलेले नाहीत. पगाराचे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. होमगार्डचे पगार झालेले नाही. असे एक ना अनेक प्रश्न असून राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर हे सरकार जायला हवे, असे राणे म्हणाले.

वारकरी संप्रदायाचा अवमान
जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कोण अशा मुख्यमंत्र्याला ठेवणारही नाही, असे सांगत पंढरपूरच्या महापूजेवरून राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पंढरपुरातील आषाढीची महापूजा महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची असते पण या पूजेला मुख्यमंत्र्यांनी महत्त्व दिले नाही. मुख्यमंत्री पंढरपुरात गेले तर साधा गंध लावला नाही आणि प्रसादही हातात घेतला नाही. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, असे राणे म्हणाले. जर पिंजर्‍यातच राहायचे होते तर मग मातोश्रीतच विठ्ठलाची पूजा करायला हवी होती. पंढरपुरात कशाला गेलात?, असा सवाल राणे यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तर त्यांच्या पुढे आहेत. गरम वाटतं म्हणून ते थेट कारमध्ये जाऊन एसीत बसले, असेही राणे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई भकास शिवसेेनेनेच केली
महाराष्ट्र राज्य अधिकारी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश दिसत नाही. बदल्या परस्पर केल्या जातात. आणि त्या परत रद्द केल्या जातात. अशाप्रकारे राज्य चालू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर मी ठाम आहे व ते माझे वैयक्तिक मत आहे, असे राणे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मुंबई पालिकेएवढा भ्रष्टाचार देशात दुसर्‍या कोणत्याच संस्थेत नाही. गेली २५-२६ वर्षे मुंबईत विकास झाला नाही. जागतिक कीर्तीचे हे शहर भकास झाले आहे. याला केवळ शिवसेना जबाबदार आहे, असा आरोपही राणेंनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -