मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीला आमचे खासदार जाणार नाहीत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी बैठक सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केले. सध्या या बैठकीची चेष्ठा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परंपरेला काळीमा फासल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यातील शिंदे यांचे सरकार औटघटकेचे सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर यांचे शंभर टक्के विसर्जन होणार असून हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, असा दावाही राऊत यांनी केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शक्तिस्थळावर शक्तिप्रदर्शन
केंद्र सरकारकडून उद्या, बुधवारी सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आमचे खासदार जाणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले.
ही बैठक म्हणजे सगळा फार्स आहे. आधीची पूर्वनियोजित बैठक आम्हाला कारण न देता रद्द करण्यात आली. मंगळवारी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून तिथे जाणे गरजेचे असल्याने आम्ही या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे राऊत म्हणाले.
धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भात बोलताना विनायक राऊत यांनी हे चिन्ह शंभर टक्के आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती झालेली आहे, ते पाहता राजकीय दबावापोटी त्यांनी असा कुठलाही निर्णय देऊ नये. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे हे सर्व राष्ट्रीय नेत्यांना भारी पडत असल्यानेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यासमोर आणावे लागत आहे. आमच्याकडे आता अद्वय हिरे आले आहेत. आम्हाला जैन समाजाचा आशीर्वाद आहे. तसेच आमच्याकडे उत्तर प्रदेशचे नेते आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
हेही वाचा – निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटाचे लेखी उत्तर पोहोचले, युक्तिवादात काय म्हटलंय?