अतिवृष्टीमुळे चिपळूणमधली पूरस्थिती अधिक बिकट झाली आहे. पूराच्या पाण्याने कोवीड रुग्णालयालाही वेढा घातला असून यादरम्यान, ८ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ऑक्सिजन अभावी हे मृत्यू झाल्याचा आरोप कोरोनामृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीने मुंबईसह , रायगड, पालघर, कोकण, कोल्हापूर या जिल्ह्यांना अक्षरश; झोडपून काढले आहे. चिपळूणमध्ये ढगफुटी झाल्याने रस्ते, घरे , बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. तर इमारती व रुग्णालयांमध्येही पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्याने येथील कोवीड सेंटरलाही वेढले आहे. यामुळे अॅम्ब्युलन्सही सेंटरपर्यंत पोहचू शकत नाहीये. याचदरम्यान, या कोवीड सेंटरमध्ये ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोवीड सेंटरला चारही बाजूने पूराच्या पाण्याने वेढल्याने रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचले नाही यामुळेच आमची माणसं गेली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
हेही वाचा – ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री