Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. नुकताच अंगणवाडी सेविकांनी मुंबईत आंदोलनही केले. यावरून विधानसभेत आज जवळपास १०० आमदारांनी प्रश्न मांडले. हे प्रश्न मांडताना सरकार आणि विरोधक यांच्यात खडजंगी पाहायला मिळाली.
हेही वाचा – गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती प्रक्रिया रखडली, गिरीश महाजनांनी सांगितली ‘अंदर की बात’
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांची वाढ केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मात्र, यावरून अजित पवारांनी हरकत घेतली. शेतावर जाणाऱ्या शेतमजुरांनाही दिवसाला ३०० रुपयांची मजुरी मिळते. म्हणजे, महिन्याला ते दहा हजार रुपये मिळतात. मग शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सेविकांना अल्प मानधन का मिळते याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये आणि मदतनिसांना १० हजार मानधन देण्याची मागणी अजित पवारांनी केली. यावरून मंगल प्रभात लोढा यांनी २० टक्के मानधन वाढीचा पुनरूच्चार केला. ही आतापर्यंतची सर्वाधिक मानधन वाढ असल्याचंही ते म्हणाले. तसंच, येत्या काळात अजित पवारांच्या मागणीचा विचार टप्प्याटप्प्याने केला जाईल, असंही मंगल प्रभात लोढा म्हणाले.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून मंगल प्रभात लोढा यांनी अधिकृत आकडेवारी देण्यास नकार दिला. करीब करीब असा शब्द वापरून मंगल प्रभात लोढा यांनी मोघम आकडेवारी दिली. यावरून विरोधकांनी मंगल प्रभात लोढा यांना घेरलं. बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडेंसहित अजित पवारांनी या शब्दावरून मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका केली.
हेही वाचा – विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले; म्हणाले, किमान पुढच्या अधिवेशनाआधी…
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेत विरोधकांना ठोस उत्तर मिळाले नसल्याने विरोधक सभात्याग करत असल्याची घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली. १०० हून अधिक आमदारांनी अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर लक्ष वेधलेले असताना सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा होत नसल्याने आम्ही सभात्याग करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
विरोधकांनी सभात्यागाची घोषणा करताच आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं. २०१९ ते २०२२ च्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. या काळात अंगणवाडी सेविकांसाठी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी किती निर्णय घेतले? किती बैठका घेतल्या? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला. तसंच विरोधकांना पळपुटे म्हणत सरकारने केलेल्या घोषणांचा पुनरुच्चार आशिष शेलारांनी केला.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकासमंत्री @MPLodha यांनी आम्ही उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर दिली.@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
#BudgetSession2023 #AshishShelar pic.twitter.com/YYxAE2UGAh— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 3, 2023