वर्ष २०२१ आता संपुष्टात येण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. पण वर्ष २०२१ ला याआधीच्या वर्षापेक्षाही म्हणजेच २०२० च्या तुलनेतही अतिशय भयंकर वर्ष मानले जात आहे. मानवी इतिहासात सर्वाधिक नैसर्गिक आणि आपत्कालीन संकट येणारे वर्ष म्हणजे २०२१ असे म्हटले तरीही काही वावगे ठरणार नाही. पण या आपत्कालीन संकटांमुळे अनेक देशांमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनात आणखी आव्हाने निर्माण करण्याचे काम केले. दुनियेत क्वचितच असा एखादा देश असेल ज्याठिकाणी पर्यावरणीय बदलांचा (Climate Change) परिणाम दिसून आला नसेल. अवकाळी पाऊस, पर्यावरणीय बदलांमुळे बर्फ वितळणे, चक्रीवादळे तसेच अतिवृष्टीने पूरपरिस्थिती अशा अनेक आपत्कालीन संकटांचा सामना हा जगभरातील अनेक देशांनी केला. त्यामध्ये जिवितहानी होतानाच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले.
वैज्ञानिकांनी मांडलेल्या अनेक उदाहरणांमध्ये जगभरातून क्लायमेंट चेंजच्या अनेक घटना यंदाच्या वर्षात समोर आल्या आहेत. पण येणारे वर्षही अतिशय आव्हानाचे असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पृथ्वीवर आणखी संकटे येण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या २०२० च्या आकडेवारीनुसार या वर्षात ६४३८ आपत्कालीन घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये १२ लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. एकट्या चीनमध्ये ५७७ आपत्कालीन दुर्घटना समोर आल्या. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून याठिकाणी ४६७ घटनांची नोंद झाली. भारतात गेल्या २० वर्षात ३२१ घटनांची नोंद झाली आहे.
वर्ष २०२१ मध्ये कोणत्या आपत्कालीन घटनांची नोंद ?
अमेरिका, चीनसह भारतात आपत्कालीन संकटांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जिवित हानी झाली. जवळपास प्रत्येक महिन्यातच पर्यावरणीय बदलांमुळे आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण जातानाच मोठ्या प्रमाणात जिवित हानी झाल्याचेही समोर आले आहे.
फेब्रुवारी
अमेरिकेतील सर्वात उष्ण प्रदेशातील टेक्सास शहरामध्ये कोल्ड वेव्ह (शीतलहर) ची नोंदवली गेली. या थंडीच्या लाटेमुळे १२५ लोकांचा मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीत लोकांना विजेशिवायच राहण्याची वेळ आली. वैज्ञानिकांना सुरूवातील यामागचे कारण कळू शकले नव्हते. पण टेक्सासमध्ये बदललेल्या वातावरणामुळेच हा परिणाम झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. आर्कटिक येथे उष्णतेत वाढ झाल्याने जगभरातील वातावरणात बदल झाल्याचे समोर आले.
मार्च
चीनची राजधानी बिजिंगमध्ये अचानक धुळीच्या वातावरणाने एक वेगळेच आच्छादन आकाशात तयार झाले. हे धुळीचे वातावरण इतके भयानक होते की, त्यामुळे अनेक फ्लाईट्स रोखाव्या लागल्या. वैज्ञानिकांनी या संपूर्ण दशकातील खराब वादळ म्हणून नोंदवण्यात आले.
एप्रिल
आसाम येथे २८ एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या ६.४ टक्के तीव्रतेच्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. तर १२ ते १३ लोक गंभीररीत्या जखमी झाल्याचे समोर आले.
मे
भारतात मे हा महिना अतिशय आव्हानाचा होता. या महिन्यात देशात दोन चक्रीवादळांचा सामना करावा लागला. पहिले चक्रीवादळ म्हणजे तौक्ते वादळ हे १४ मे २०२० रोजी अरबी समुद्रात निर्माण झाले. त्यामुळेच गुजरातच्या किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. तोक्ते चक्रीवादळामुळे १७४ लोकांचा मृत्यू झाला. तर ८० लोकांचा अद्यापही पत्ता लागला नाही. त्याशिवाय दोन लाख लोकांना आपले घर सोडून स्थलांतर करून कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली.
दुसरे चक्रीवादळ हे ‘यास’ च्या रूपात आले. या वादळाने पश्चिम बंगालला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवले. २३ मे २०२१ रोजी यास चक्रीवादळ हे ओरिसाच्या किनारपट्टीला धडकले. त्यानंतर बंगालच्या दिशेने पुढे जात हे चक्रीवादळ चीनला धडकले. भारत आणि बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे २० लोकांचा मृत्यू झाला.
जून
अमेरिका आणि कॅनडा देशात २०२१ हे वर्ष अतिशय उष्णतेचे होते. या दरम्यान दोन्ही देशाचे तापमान ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले. वातावरणातील तापमान वाढीसाठी याआधीच सुरू झालेल्या पर्यावरणीय बदलांचा हा परिणाम असल्याचे मत वैज्ञानिकांचे मांडले. भीषण उष्णतेमुळेच दोन्ही देशांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या उष्णतेचा परिणाम म्हणजे अमेरिकेत वीज पारेषण करणाऱ्या वाहिन्यांच्या तारा वितळण्याचा परिणाम झाला होता. तसेच रस्त्यांना भेगा पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडला. अनेक शहरांमध्ये या कालावधीत कुलिंग सेंटर्स उघडण्याची वेळ अमेरिकेत आली. तसेच उष्णतेपासून वाचण्यासाठीही अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
जुलै
याच महिन्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दुष्काळही निर्माण झाला होता. २०२० च्या सुरूवातीलाच पाण्याची टंचाई निर्माण झाली. परिणामी अमेरिकेत परिस्थिती अतिशय भीषण झाली. शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या शेतातूनही काढता पाय घेतला. तसेच हूवर बांधाच्या ठिकाणी पाण्याची पातळी घसरल्याने आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली होती.
चीनच्या हेनान प्रांतातही अतिवृष्टीमुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. चीनच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात तीन दिवसात झालेला पाऊस हा संपुर्ण वर्षभरात होतो. परिणामी अनेक ठिकाणी मेट्रोच्या मार्गामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याचा परिणाम भोगावा लागला.
युरोपच्या जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलॅंड येथील अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या तिन्ही देशातच २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पर्यावरणीय बदलामुळे येत्या काळात अशा घटनांमध्ये २० टक्के अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि ओरेगॉन येथील जंगलात लागलेल्या आगीमुळेच या राज्याच्या इतिहास सर्वात मोठी आगीची घटना म्हणून ही आग ओळखली जात आहे. त्याशिवाय दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे या दशकातील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला. ब्राझीलच्या अनेक भागात यंदाच्या वर्षातही दुष्काळाचीच परिस्थिती होती.
ऑगस्ट
या महिन्यात मेडिटेरेनियमच्या अल्जीरिया, ग्रीस आणि तुर्कीच्या तीन जंगलात लागलेली आग ही या राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आग ठरली. ग्रीसमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. तर अल्जीरिया येथे ६५ लोकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एल्प्सच्या डोंगराळ भागात बर्फ वितरळण्याची सुरूवात झाली. बर्फ वितळण्याची प्रक्रिया पाहता स्वित्झर्लंडच्या रिसॉर्ट कर्मचाऱ्यांकडून माउंट टिटलिस येथे घोंगडी टाकण्याचेही प्रकार समोर आले.
सप्टेंबर
भारतातील चक्रीवादळामुळे फटका बसण्याची आणखी एक घटना या महिन्यात घडली. बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे २४ सप्टेंबरला गती घेतली. २६ सप्टेंबर रोजी हे वादळ आंध्र प्रदेशला धडकले. पण त्यानंतर वादळाची तीव्रता कमी झाली. सुरक्षा कारणामुळे ५६ हजार लोकांचे स्थलांतरण करून त्यांना वेगळ्या ठिकाणी कॅम्पमध्ये आश्रय देण्यात आला.
भारताशिवाय अमेरिकेतही चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. लूजियाना येथे श्रेणी ४ इतक्या तीव्रतेचे वादळ धडकले. तर लूजियाना येथे १०० लोकांच्या मृत्यूमुळे १०० लोकांचा मृत्यू झाला होता. आगीमुळेही अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचा पूराच्या परिस्थिचा फटका बसला.
नोव्हेंबर
भारतात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका म्हणजे अनेक राज्यात या पावसाने नुकसान केले. तसेच एक नोव्हेंबरला तामिळनाडू येथे सुरू झालेल्या मोठ्या पावसामुळे पूराचे रूप धारण केले. त्यामध्ये ४१ लोकांचा मृत्यू झाला. तर ११ हजार लोकांचे स्थलांतर झाले.
त्यादरम्यानच दक्षिण सूदानच्या ६० वर्षांतील सर्वात भयानक अशा पूराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये ७ लाख ८० हजार लोक प्रभावित झाले. पर्यावरणीय बदलामुळेच दक्षिण सूदान भागात लागोपाठ तीन वर्षे पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्याशिवाय कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया येथे नोव्हेंबर महिन्यातील पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कॅनडाच्या संपूर्ण इतिहासात ही सर्वाधिक आर्थिक झळ पोहचवणारी अशी हानी आहे.