घरमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. पास मिळणार!

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. पास मिळणार!

Subscribe

राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी बसचा मोफत पास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ एस.टी. प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेत आहेत त्यांनाही मोफत एस. टी. पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सवलती दिल्या जाव्यात, या छात्र भारतीच्या महत्वाच्या मागण्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. शिक्षण-रोजगाराच्या हक्कांसाठी छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढला होता. हजारो तरुण मुंबईत दाखल झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान भवनात भेट घडवून आणली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली.

इतर मागण्यांवर सकारात्मक आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात या मागणीविषयी चौकशी करून कार्यवाही करण्याचं मान्य केलं. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर करावा या मागणीवर सकारात्मक कृतीचे आश्वासन दिले आहे. दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करुन त्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्व परीक्षांसाठी येण्याचा जाण्याचा प्रवास खर्च शासनाने द्यावा, या मागणीवरही विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी. स्थगित शिष्यवृत्या पूर्ववत सुरु कराव्यात. या मागणीवरही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

१५ नोव्हेंबरपासून पुण्यातून लाँगमार्चला सुरुवात

पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यापासून १५ नोव्हेंबरला या लाँगमार्चची सुरवात झाली होती. लाँगमार्चमधील हजारो तरूण पायी चालत मंत्रालयावर धडकणार होते. लाँगमार्च पाचव्या दिवशी मुंबईत आला आणि मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दुपारी ३.३० वा. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात चर्चेसाठी लाँगमार्चच्या प्रतिनिधींना बोलावलं. या भेटीनंतर या प्रतिनिधींना प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.


तुम्ही हे वाचलंत का? – अन गोटेंनी खडसेंसमोर चक्क हात जोडले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -