Homeदेश-विदेशDevendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचा रेकॉर्ड, फडवीसांकडून एकूण गुंतवणुकीची माहिती

Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचा रेकॉर्ड, फडवीसांकडून एकूण गुंतवणुकीची माहिती

Subscribe

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दोन दिवसांत 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 54 सामंजस्य करार केले आहेत. याप्रकरणी आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण गुंतवणुकीची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दोन दिवसांत 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 54 सामंजस्य करार केले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण गुंतवणुकीची माहिती दिली आहे. (CM Devendra Fadnavis gave information about the total investment in Davos)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रात एमओयू झाले आहेत. विदर्भात 5 लाख कोटी गुंतवणुकीचे करार, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 35 हजार कोटींचे गुंतवणूक करार, मराठवाड्यातही चांगले एमओयू झाले आहेत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मराठवाडा नवीन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. गडचिरोलीत आपल्याला 98 टक्के गुंतवणूक थेट एफडीआयच्या माध्यमातून होत आहे. परदेशी गुंतवणुकीमुळे राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सुरुवात केली होती, तसेच मागच्या वेळी जे करार झाले त्यातील अनेक करार मार्गी लावू शकलो आहोत. इतर राज्यांच्या कराराच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा आनंद आहे, अशी भावना फडणवीस यांनी बोलून दाखवली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दावोस हे जागतिक नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील सीईओ वर्ल्ड इकोनॉमी फोरमनिमित्त याठिकाणी येत असतात. ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत आपण करार केले आहेत, त्यांची इच्छा असते त्यांचे जे फॉरेन पार्टनर आहेत ते आपल्या करारावेळी उपस्थित असले पाहिजेत, त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळेजण दावोसला एकत्र येतात. त्यामुळे सर्व करार दावोसमध्ये होतात. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपण आपली ताकद दाखवतो. नेटवर्किंक फोरममधून सगळे एकमेकांना भेटतात. गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळे दावोस हे केंद्र म्हणून पुढे येत आहे. भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Davos Summit : यासाठी दावोसला जायची काय गरज, अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल

दरम्यान, देशभरात एमओयूची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे याचे प्रमाण 40 टक्के आहे. राज्यात 60 ते 65 टक्के प्रमाण आहे. डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र कॅपिटल होत आहे. ऑइलपेक्षा जास्त किंमत डेटाची झाली आहे. डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात राज्य पुढे जाणार आहे. महाराष्ट्राला 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना आनंद होत नसेल तर त्याचा इलाज नाही. आपण जे काही करतोय ते महाराष्ट्रासाठी करतो आहोत. ज्यांनी वेगवेगळे ट्वीट केले त्यांना फार उत्तर द्यायची गरज नाही. इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात गुंतवणूक येते आहे, त्याचा आनंद आहे, असा पुनरुच्चार करत फडणवीसांनी दावोस दौऱ्याप्रकरणी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच उद्योग मंत्र्यांनीही स्वत:लक्ष घालून सगळे करार व्यवस्थित व्हावे, याकडे जातीने लक्ष दिले. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आज चांगला दिवस आहे, असे फडणवीस म्हणाले.

दावोसमध्ये ट्रम्प आणि भारताबद्दल सर्वाधिक चर्चा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया पॅव्हेलियनमध्ये अनेक राज्य आले, परंतु त्यात बोलबाला फक्त महाराष्ट्राचा होता. राज्यातील जनतेने ही संधी दिल्याने आम्ही या गोष्टी करू शकलो. ज्या 6 राज्यांना दावोसच्या संमेलनाला येण्याची संधी मिळाली होती, त्यात महाराष्ट्राचा समावेश होता. ही अभिमानाची गोष्ट आहे. दावोसमध्ये आर्टिफिशयल इंटेलिंजेस ही थीम होती. त्यावर खूप चर्चा झाली. ट्रम्प यांच्या विजयानंतर तिथले प्रशासन आणि भारत या दोन विषयांवर सर्वाधिक चर्चा झाली, असे याठिकाणचे लोक बोलत होते. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड उत्सुकतेचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जे नेतृत्व मिळवून दिले, त्याचे प्रत्यंतर आम्हाला पाहायला मिळाले. दावोसमध्ये आम्ही सहा राज्याचे मुख्यमंत्री असलो, तरी वेगळ्या पक्षाचे होतो. असे असले तरी आम्ही सर्वांनी एक भारत म्हणून आमची भूमिका मांडली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – Eknath Shinde : शिवसेनेवरील टीका बंद झाली नाही तर ठाकरेंचे 20 चे 2 आमदार व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल