घरमहाराष्ट्र'छगन कमळ बघ', मुख्यमंत्र्यांनी घेतली विरोधकांची शाळा!

‘छगन कमळ बघ’, मुख्यमंत्र्यांनी घेतली विरोधकांची शाळा!

Subscribe

अंकमोजणी पद्धतीमध्ये केलेल्या बदलावर विरोधकांनी उपहासात्मक टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी या टिकेला विधानसभेत उत्तर दिलं.

बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अंकमोजणीची नवी पद्धत रुढ केल्यामुळे अनेक स्तरातून सरकारविषयी नाराजीचा सूर उमटला आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करत असताना विरोधकांनी या अभ्यासपद्धतीची खिल्ली उडवली होती. आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देत असताना विरोधकांची चांगलीच शाळा घेतली. ‘बालभारतीच्या पुस्तकात २० + १ एकवीस अशी अंकमोजणीची पद्धत ही केवळ गणिताची संकल्पना सुलभतेने समजून घेण्यासाठी असून मूळ पद्धतीत कोणताही बदल केलेला नाही. आपण लहान असताना देखील ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण’, असे शिकलो होतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, ‘या नावांचा ज्येष्ठ नेत्यांशी संबंध नाही’, अशी गुगली त्यांनी टाकताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

सरकारचा हस्तक्षेप नाही

बालभारतीच्या बदलेल्या अभ्यासक्रमाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्यापरिषद) (MSCERT) ही स्वायत्त संस्था अभ्यासक्रमातील बदल ठरवत असते. सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसतो. विद्यापरिषदेच्या वतीने तज्ज्ञ व्यक्तींची अभ्यासक्रम ठरविण्यासाठी निवड करण्यात येत असते. अंकमोजणीची ही नवीन पद्धत ज्यांनी आणली त्यांच्यावर बरीच टीका झाली असली तरी त्यांनीही वर्तमानपत्रात लेख लिहून आपल्या पद्धतीचे समर्थन केलेले आहे. विद्यार्थ्यांना सुलभरितीने अंकगणित समजावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे.’

- Advertisement -

..आणि अजित पवार म्हणाले ‘घड्याळ बघ’!

हा बदल लक्षात आणून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बालभारतीच्या पुस्तकातील ‘छगन कमळ बघ, हसन झटकन उठ’, अशा वाक्यांचे वाचन केले. त्यानंतर सभागृहात विरोधकांसहित सर्वांनीच हसून दाद दिली. अजित पवार यांनी मध्येच ‘घड्याळ बघ’ असेही वाक्य असल्याचे सांगितले. याबाबत सरकारची भूमिका सांगत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जर सभागृहाची सदर पद्धत बदलण्याची इच्छा असेल तर तज्ज्ञ लोकांची समिती नेमली जाईल आणि या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असा अहवाल त्यांनी दिला तर त्यात बदल करू’, असे आश्वासन सभागृहाला दिले.


हेही वाचा – वीस सात ‘सत्तावीस’, तीस आठ ‘अडतीस’; हे आहे गणिताचे अजब पुस्तक!

‘…म्हणून तावडेंचं खातं काढलं का?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना या नव्या अंकमोजणीच्या पद्धतीवर बरीच टीका केली होती. ‘यापुढे मुख्यमंत्र्यांना फडण दोन शून्य किंवा बावनकुळे यांना पन्नास दोन कुळे असे म्हणायचे का?’ असा खोचक प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. तसेच ‘अभ्यासक्रमात हा नको तो बदल केल्यामुळेच विनोद तावडे यांचे शिक्षण खाते काढून घेतले असावे’, अशी कोपरखळीही त्यांनी मारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -