सध्या आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून आता भाजपा आणि शिवसेना देखील कामाला लागले आहेत. त्यातच आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी गेल्या चार वर्षांत काय कामं केली याचा लेखाजोखा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करावयाचा आहे. यातून त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल सरकारने उचलले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षातील कामकाजाचा अहवाल मंत्र्यांना द्यावा लागणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात मंत्र्यांचे सादरीकरण
भाजपा- शिवसेनेला सत्येत येऊन आता चार वर्षे होतील. याच चार वर्षांत मंत्र्यांनी नेमकी काय महत्वाची कामं केली याचा लेखाजोखा आता मंत्र्यांना सादर करावा लागणार आहे. २४ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर या दोन दिवशी सह्याद्री अतिथीगृहात सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या चार वर्षांत आपण केलेल्या ४ महत्वपूर्ण कामाचे सादरीकरण करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सादरीकरण सुटसुटीत आणि जे महत्वाचे निर्णय चार वर्षांत घेण्यात आले आहेत, त्याचा जनमानसावर काय परिणाम झाला हे देखील या सादरीकरणात असावे, अशी अट घालण्यात आली आहे.
हे मंत्री राहणार उपस्थित
या सादरीकरणा दरम्यान त्या-त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सेक्रेटरी उपस्थित असणार आहेत. विशेष म्हणजे १५ मिनिटांच्या सादरीकरणामध्ये मागील १५ वर्षांची तुलना आकडेवारी देणे महत्वाचे असणार आहे. तसेच प्रत्येक विभागाने त्याच्या सादरीकरणापूर्वी १५ मिनिट आधी पेनडाइव्ह देणं बंधककारक आहे.
या वेळेतच सादरीकरण करावे लागणार
- १०.३० ते १०.४५ – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
- १०.४५ ते ११ – अन्न व औषध प्रशासन
- ११ ते ११.१५ – महसूल विभाग
- ११.१५ ते ११.३० – सार्वजनिक बांधकाम विभाग
- ११.३० ते ११.४५ – कृषी व फलोत्पादन विभाग
- ११.४५ ते १२ – पर्यावरण
- १२ ते १२.१५ – ऊर्जा विभाग
- १२.१५ ते १२.३० – राज्य उत्पादन शुल्क
- १२.३० ते १२.४५ – पाणी पुरवठा ते स्वछता
- १२.४५ ते १ – सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण
- १.१५ ते १.३० – सामाजिक न्याय
- २ ते २.१५ – जलसंधारण
- २.१५ ते २.३० – रोजगार हमी
- २.३० ते २.४५ – पर्यटन