राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू आहे. मनसेनेही कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. आम्ही सगळेजण शिवरायांचा आदर करणारे आहोत. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाने आदराने बोलले पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अतिशय दळभद्री विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी नॅशनल चॅनेलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली असं विधान केलं आहे. वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले यांचा अपमान करायचा, छत्रपती संभाजी महाजारांचा अपमान करायचा, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी कधी मागितली? हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपचे आता सहयोगी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : भाजपाकडून शिवरायांचा अपमान, शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा; राऊतांची मागणी