विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. मात्र, भाजपकडे कोण आहे? असा प्रश्न विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तर याला उत्तर देताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले की, अनेक चेहरे हे रावणाला असतात, तिकडे असणारे सगळे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. (CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray and India Aghadi Parties on Loksabha election 2024)
अहमदनगरच्या राहता तालुक्यात डॉक्टर विठ्ठलराव विखथे पाटील पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या कार्यक्रमाला हजर आहेत. या कार्यक्रमावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मुंबईत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. कशाला आलेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसं लढावं यावर चर्चा करायला एकत्र आले आहेत. मी त्यांना सांगेन, आग सेम मत खेलो, तो आपके हात जल जाएंगे ( आगीशी खेळू नका, नाहीतर तुमचे हात भाजतील) काल-परवा कोणीतरी सांगितलं पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. खरंतर, अनेक चेहरे कोणाला असतात हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत.
(हेही वाचा: 1 बिलिअन डॉलर्स कुणाचे? राहुल गांधीचा पुन्हा एकदा अदानी आणि मोदींवर हल्ला )
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, अशी टीका भाजपकडून केली जात आहे, या प्रश्नावर उत्तर देताना इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी अनेक चेहरे आहेत. पण भाजपकडे कोणता पर्याय आहे, जो आहे त्याने १० वर्षांत काय केले, हे त्यांनी सांगावे, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले.
इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांची राजकीय विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देश म्हणजे परिवार मानतो. त्यामुळे लोकशाही वाचविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणत्याही हुकूमशहाला आम्ही भारतमातेच्या हातापायात बेड्या घालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता दिला.