मुंबई : लवकरच राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता बदल होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पदावरून पायउतार होणार व यांसारख्या अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत, पण त्यासाठी विरोधकांकडून अजित पवार यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. कारण अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यामुळे शिंदेंना आजारपण आल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे खरंच आजारी आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करण्यात येत असतानाच आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. टीकाकारांना सत्ता गेल्यामुळे वेड लागले आहे, त्यांना काहीही सूचत नाही, म्हणून ते अशी विधाने करत असतात, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. (CM Eknath Shinde explained about the transfer of power in the state)
हेही वाचा – राज्यातील नेतृत्वबदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू |
ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार असे ते वारंवार म्हणतात. पण, सरकार पडता पडता म्हणणारे पाहत आहेत की, हे सरकार मजबूत होत चालले आहे. सत्ता गेल्यामुळे ज्यांना वेड लागले त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
तर मुख्यमंत्री काही मुद्दामहून आजारी पडले नाही, असे आमदार बच्चू कडू यांच्याकडूनही सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ते आजारी पडले हे बिलकुल खोटे नाही. आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो तेव्हा त्यांचा ताप हा 103 होता. सातत्याने काम करत असल्याने धावपळ आणि दगदगीतून हे आजारपण आले असावे. नेतृत्त्व बदलासाठी आजारपण घेण्याची गरज नाही. मला ठाम विश्वास आहे, 2024 पर्यंत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आणि जर तो बदल झाला तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपला इशारा दिला आहे.
मागील आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले होते. सहकार क्षेत्राशी संबंधित असलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण यानंतर झालेल्या पुण्यातील चांदणी चौक पुलाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. ज्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप वाढल्याने त्यांना आजारपण आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.