संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नावडी गावात विजेचे जोडकाम करताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत ४ कंत्राटी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजताच या घटनेची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना फोन करून त्यांना या कंत्राटी मजुरांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसे झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना मदत देण्याची तयारीही शिंदे यांनी दर्शवली आहे.
कन्नड तालुक्यातील नावडी येथे विजेच्या जोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या झटक्याने या मजुरांचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. जगदीश मुरकुंडे, भारत वरकड,अर्जुन मगर,गणेश थेटे अशी या मजुरांची नावे आहेत.
हेही वाचा : ठाण्यात कोसळधार, टेरेसवरील शेडचे लोखंडी पत्रे उडाले