यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती साजरी करण्यात येत आली. यावर्षी पहिल्यांदाच ही जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब अभिमानाची असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, पण या कार्यक्रमात काही लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांर निशाणा साधला. (CM Eknath Shinde harsh criticism of opposition on inauguration of New Parliament Building)
हेही वाचा – भाजपाला 2024 मध्ये निवडून द्यायचं की नाही हे…; सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण केलेय. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदारांना आणि मंत्र्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे आग्र्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्याचप्रमाणे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्याच्या लढाईत जे योगदान आहे आणि त्याग आहे, याबाबत सर्वांना माहिती आहे. ते साहित्यिक होते. समाजसुधारक होते. आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन होतेय, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण
पंकप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक वास्तूची संकल्पना 2019 मांडली. त्यानंतर विक्रमी वेळेत ही वास्तू लोकार्पित होतेय, ही अभिमानाची बाब आहे. या नव्या वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धींगत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भक्तीभावाने या कार्यक्रमाला सुरूवात झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.
विरोधकांवर साधला निशाणा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आजचा कार्यक्रम पार पडत आहे. पण काही लोकांनी विविध कारणं सांगत या कार्यक्रमाला आक्षेप घेतला हे दुर्दैव आहे. घराणेशाहीमध्ये अडकलेल्या पक्षांना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्त्ववाद आणि सावकरांचं वावडं आहे, असे आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. तर काही लोकांनी आजच्या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधकांना जनता जमालगोटा देईल
आजच्या कार्यक्रमामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, असे मत याआधी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या पोटदुखीवर जनता जमालगोटा देईल, असेही त्यांच्याकडून आता सांगण्यात आले आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची विरोधकांना पोटदुखी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.