राज्यातील राजकारणाला सध्या वेगळंच वळण लागलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बऱ्याच दिवसानंतर राजकारणातून विसावा घेतला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला न्यायालयात प्रलंबित असताना देखील दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शिवारात रमले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी दरे येथे आले आहेत. दरे हे गाव सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. एकनाथ शिंदे गावातील शेतात रमले आहेत. सकाळी शेताच्या बांधा-बांधावरुन जात शेतामध्ये ठाण मांडलं. अनेक पिकांची लागवड केली. तसेच नांगरट देखील केली. यावेळी शिवारात फेरफटका मारत स्ट्रॉबेरी, हळद, केळी अशा विविध पिकांसह शेततळ्याची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळा ही तयार केले आहे. गोशाळेतल्या गाईंना रसायनमुक्त असलेला चारा दिला जातो. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शेततळ्यात मत्स्योत्पादनही केलं जातं. शिंदेंनी शेततळ्यात असलेल्या माशांना स्वत:च्या हाताने खाऊ घातले. संपूर्ण शिवारात फिरण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रीक गाडीचा वापर केला. त्यांच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं-वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल १० फुट आहे.
मागील महिन्यात एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी आले होते, परंतु पावसामुळे ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी मंदिरात जाऊन ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेतले. दरे बुद्धुकच्या शेजारीच असलेल्या सासुरवाडीलाही मुख्यमंत्री जाऊन आले. यावेळी त्यांनी शिवारात फेरफटका मारला.
हेही वाचा : मुंबईतील ५,८०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा महापालिकेकडून रद्द