ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर काल भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. भारताच्या या विजयाने भारतीयांची दिवाळी गोड झाली आहे. टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर भारतभर मोठा आनंद पाहायला मिळाला. अनेकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. दरम्यान भारत पाक मॅचदरम्यान मेलबर्न स्टेडियमवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं बॅनर झळकवताना दिसले. याच मुद्द्यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. भारत- पाक मॅचप्रमाणे 3 महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकली, ती या महाराष्ट्राने पाहिली, देशाने पाहिली आणि जगाने पाहिली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दिवाळीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काल आपण इंडिया पाकिस्तान मॅच जिंकली, त्याचा आनंद सगळीकडे साजरा झाला. आपण पाहिलं की माहित नाही, पण मेलबर्नच्या स्टेडियममध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकळी, कालची मॅच जिंकली, तसेच आम्ही तीन साडे तीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकली, ती या महाराष्ट्राने पाहिली, देशाने पाहिली आणि जगाने पाहिली. लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्याची दखल सर्वांनी घेतली. म्हणून आम्ही आल्या आल्या आपली परंपरा, संस्कृती आणि सण उत्सावांच्या माध्यमातून एक मोकळा श्वास घेऊन रस्त्यावर उतरली.
आपापल्या परीने भक्तीभावाने आपली संस्कृती, परंपरा पुढे प्रयत्न केला. विकासाबरोबर याही गोष्टी आवश्यक आहेत. शेवटी माणसंच मन प्रसन्न असेल तर त्याला उर्जा, प्रेरणा सगळ्या गोष्टीत पुढे जाण्याचा प्रयत्न होतो. या राज्यात परिवर्तनाचं पर्व सुरु झालं आहे. हे विकासचं पर्व आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.