घरताज्या घडामोडीमविआकडून फक्त एकाच प्रकल्पाला मान्यता आणि आम्ही... एकनाथ शिंदेंची खोचक टीका

मविआकडून फक्त एकाच प्रकल्पाला मान्यता आणि आम्ही… एकनाथ शिंदेंची खोचक टीका

Subscribe

निळवंडे धरणातून आज कालव्‍यात पाणी सोडण्‍याची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना-भाजपा महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण मविआकडून फक्त एकाच प्रकल्पाला मान्यता मिळाली, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) खोचक टीका केली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज एक आनंदाचा दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज एक आनंदाचा दिवस आहे. खरं म्हणजे सगळ्यांना एक कुतुहल होतं की, आज पाणी या कालव्यातून सोडलं जाईल आणि त्याला साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व येथे आला आहात. मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही बोलावलंत. त्यामुळे आम्हाला ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आज प्रत्यक्षात आपण पाणी सोडण्याचा दिवस पाहतोय. या प्रकल्पात अनेक चढ-उतार आले. तरी देखील तुम्ही त्याला मदत केली आणि सहकार्य केलं. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यातून हा लोककल्याणाचा प्रकल्प आज याठिकाणी साकार होतोय.

- Advertisement -

मविआकडून फक्त एकाच प्रकल्पाला मान्यता

शिवसेना-भाजपा महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सर्वसामान्यांमध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे आणि त्यांचं जीवन सुखमय झालं पाहीजे. त्यांना शासनाच्या माध्यमातून मदत झाली पाहीजे. ही भूमिका आम्ही घेतली. पाच कोटींचा प्रकल्प आम्ही २०२३मध्ये ५ हजार १७७ कोटी इतक्या मोठ्या रकमेची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एखाद प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. परंतु आपलं सरकार आल्यानंतर २९-३० सिंचन प्रकल्पाला या सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. जवळपास ६ लाख ८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि त्याचं सिंचन होईल. त्याभागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. सगळं हिरवंगार होईल. अशा प्रकारची भूमिका आपण घेतली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं

शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकरांचं सरकार आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण मानलाय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल. त्याला नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोड कशी देता येईल. यावर केंद्र सरकार देखील आपल्याला खूप मदत करत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे अनेकांचं नुकसान

६ हजार रुपयांच्या योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाष्य केलं. आतापर्यंत पीकविम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत होते. पण आता ते पैसे आपलं सरकार भरणार आहे. फक्त १ रुपया आपल्याला द्यावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं. त्यावर देखील एनडीआरएफचे निकष होते, तेही आपण बदलले. एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. २ हेक्टरची मर्यादा होती. आपण त्याला ३ हेक्टर इतकं केलं. सततच्या होणाऱ्या पावसामुळे जे नुकसान होत होतं. तेदेखील आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे, असं शिंदे म्हणाले.

पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना सुरू केली

जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. जलयुक्तशिवार प्रकल्प आपण सुरू केला. त्याचा खूप लोकांना फायदाही झाला. परंतु अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात ही योजना पूर्णपणे बंद झाली. परंतु सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर आपण पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना सुरू केली, असं शिंदे म्हणाले.

‘निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली‌.

यावर्षीच्या बजेट मध्ये गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे .त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात नगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली‌.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे‌. मधुकरराव पिचडांनी आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन मग धरण अशी त्याकाळात भूमिका मांडल्यामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे‌. आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करू या.पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.

यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड यांनी आपले मनोगत केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालव्यात पाणी सोडल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहवयास मिळाला.


हेही वाचा : Indic Tales : अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण? अजित पवारांचा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -