घरताज्या घडामोडीपंतप्रधानांवर आरोप करणार्‍यांना फळं भोगावी लागतात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधानांवर आरोप करणार्‍यांना फळं भोगावी लागतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणार्‍यांना फळं भोगावी लागतात. तुम्ही बघितलेलेच आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी विरोधकांवर चढविला. मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रचार करण्यासाठी रविवारी बंगळुरू येथे आले होते. येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कोणा एका पक्षाचे नाहीत. ते देशाचे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात देश बलशाली होत आहे. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. जगावर आर्थिक संकट असताना पंतप्रधान मोदी यांनी ही कामगिरी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आधी कोणाला भेटत नव्हते. पंतप्रधान मोदी हे त्यांना भारतात घेऊन आले. हे केवळ पंतप्रधान मोदीच करू शकतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी हे दोनदा मुंबईत आले होते. त्यावेळी अनेकांच्या पोटात दुखत होते. तेव्हा त्यांना बघण्यासाठी शेकडो लोक आले होते. तेव्हा मी त्यांना विचारले की तुमच्यावर एवढे जण आरोप करतात. तुम्ही त्यांना उत्तर देत नाही. त्यावर ते म्हणाले, माझ्यावर आरोप करणे हे त्यांचे काम आहे. मी माझे काम करत राहतो. असे मोदी यांचे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जे जे आरोप करतात, त्यांना त्याची फळे भोगावी लागतात, असा निशाणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर साधला.

स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला गेले आहेत. बारसू येथे आंदोलन सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना बोलायला वेळ नाही. त्यांना त्यांच्या खुर्चीची चिंता आहे.
– आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना (उबाठा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -