देशात हेलिकॉप्टरने शेतात जाऊन शेती करणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. ठाकरेंच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी एका शेतकरी कुटुंबातील माणूस आहे. शेतकऱ्याच्या घरातला मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?ते काही लोकांना रुचत नाही पचत नाही. म्हणे शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरू शकत नाही का? की धनदांडगे, मोठी लोकं, सोन्याचा चमचा घेऊन आलेले लोकंच हेलिकॉप्टरमध्ये फिरू शकतात का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रताप दिनानिमित्ताने एक नेत्रदिपक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या कार्याचे कौतुक करत ठाकरे गटावरही टोलेबाजी केली. शिंदे म्हणाले की, ज्यांच्याकडे काही काम नाही ते राजकीय आरोप प्रत्यारोप करत असतात. आम्ही फक्त काम करत राहणार आहोत. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे.
लोकांच्या मनातील भावना पूर्ण करण्याचे काम सरकारने केलं आहे. काम केलं नाही असं लोक म्हणतात. आम्ही चुकलो. पण आज आम्ही कुठलेही चुकीचे काम केले नाही म्हणून तुम्ही सगळे आमच्याकडे येता. आम्ही बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करणार आहोत. आम्ही भाजपसोबत युती केली. आम्ही काही चुकलो नाही, असही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवरायांनी महाराष्ट्र घडवला. हे राष्ट्र घडवले. संपूर्ण जग शिवरायांकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते. गडांची बांधणी पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. गडाचे प्रवेशद्वार, पाण्याची साठवण, तोफा यांची भव्यता पाहून सध्याचे जग अजूनही किती मागे आहे, अशी भावना येते. ३६३ वर्षांपूर्वी अफझलखानाने महाराष्ट्रावर चालून येण्याचे धाडस केले. खानाने वार केल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर प्रतिवार करून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराजांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याला शांत बसता येणार नाही. तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागेल,” अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.