मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रिलायन्स हरकिसनदास रुग्णलायात असून त्यांच्यावर १२ नोव्हेंबरपासून उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोमवारी देण्यात आली आहे. मानेच्या स्नायूच्या आणि पाठीच्या मणक्याच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे १० नोव्हेंबरला रिलायन्स हरकिसनदास या रुग्णालयात दाखल झाले आहेत. मणक्याच्या दुखण्यांवर आलेल्या चाचणी अहवालानुसार डॉक्टरांनी मणक्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून पाठीच्या कण्याचा आणि मानेच्या स्नायूचा त्रास होता. सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी दुखण्यावर घरीच उपचार घेतला. मात्र दुखणं वाढल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल १ तास चालली असून यशस्वी झाली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. तसेच सध्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल असेही मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रिलायन्स हरकिसनदास रुग्णालयात सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील कक्षात हलविण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी यापुर्वी सांगितले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असून ते फिजिओथेरेपीचा उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या रुग्णालायत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी, मुलगा तेजस ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आहेत.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची जनतेला विनंती
मागील दोन वर्षांपासून राज्यातील विकासकामे सुरु राहावी आणि एकिकडे कोरोनाशी मुाकबला करताना मान देखील वर करण्याचा वेळ मिळत नव्हता. सहाजिकच आहे या सगळ्यामुळे माझ्या मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु मानेवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे लवकरच बरा होईल परंतु आपल्याला सर्वांना लसीचे दोन डोस घेणं गरजेचे आहे. आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा : सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे, नवा मुख्य सचिव कोण ?