लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेवर काँग्रेसने टीका केली आहे. तसेच घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेणारी शिवसेना अचानक आपल्या भूमिकेपासून कशी बाजुला झाली? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांना सोडून गृहमंत्र्यांनी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. उद्या राज्यसभेत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “जेव्हा देशात नोटबंदी झाली होती, तेव्हा सर्वात आधी शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. काश्मीरमधून कलम ३७० हटविले तेव्हा सर्वात आधी शिवसेनेने स्वागत केले होते. काश्मीरमधील पंडीतांना त्यांची घरे कोणत्या अवस्थेत आहेत, हे त्यांना पाहण्यासाठी जाऊ दिले जात नाही. मात्र दुसऱ्या बाजुला बाहेरून कोण येईल, याची तयारी केली जात आहे. धर्मामध्ये मतांचे राजकारण होता कामा नये”
“राहुल गांधी यांनी ट्विटवर विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांवर टीका केली आहे. याबाबत प्रश्न विचारला असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कोणाच्याही भाष्यावर परत भाष्य करणार नाही. मी फक्त शिवसेनेची भूमिका मांडणार आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान केल्यावर देशभक्ती असते आणि त्यांच्या विरोधात मतदान केल्यावर देशद्रोही आहात, ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. देशात राहणाऱ्या जनतेचे रोजच्या जीवनातले जे प्रश्न आहेत, ते सोडवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.