भारतरत्न, गानकोकिळा आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. संगीतविश्वासह जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींच्या जाण्याने शोकभावना व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शोकभावना
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहसंबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला, अजित पवारांनी व्यक्त केली शोक भावना
अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’यासारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनाने ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचे भावविश्व आणि देशाचे कलाक्षेत्र समृद्ध केले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही असेही अजित पवार म्हणाले.
लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे. असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवले. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केले. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादिदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभुती दिली. लतादिदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली असे अजित पवार यांनी सांगितले.
१९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्याने तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आले होते. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादिदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचे निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादिदींचे नसणे कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/bwUT9qOEXf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 6, 2022
ममता बॅनर्जी यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
Like all her fans and followers across the planet, I was also mesmerized by her voice and renderings, and felt grateful that she held Bengal and the artistes of the East so dear to her heart and so integral to her magnificent world of music.(3/3)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 6, 2022
जयंत पाटील यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे. #LataMangeshkar pic.twitter.com/nCtNbsVYDU
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 6, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक भावना व्यक्त केली आहे.
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. #LataMangeshkar pic.twitter.com/D0sZI0x2RY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
नारायण राणे यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर जी यांचे निधन अतिशय दुःखद आहे. दीदींच्या जादुई आवाजाने असंख्य गाणी अजरामर आहेत. या स्वरांच्या माध्यमातून त्या सदैव आपल्यासोबत राहतील. दीदींना माझी भावपूर्ण आदरांजली. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत.
ॐ शांति 🙏— Narayan Rane (@MeNarayanRane) February 6, 2022
किशोरी पेडणेकर यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
एक सूर्य..
एक चंद्र..
एक आमच्या लता दीदी!भारत रत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/5OFHHCLRDf
— Mayor Mumbai (@mayor_mumbai) February 6, 2022
लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात, रश्मी ठाकरेंनी व्यक्त केला शोक
लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत रश्मी ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक