विधिमंडळाच्या अंतिम आठवड्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने पालिकेच्या योजना आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावरून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिभाषण न करता माघारी परतले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदारांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. “राज्यपालांचं अभिभाषण होऊ शकले नाही याची मला खंत आहे, एवढा अपमान आजपर्यंत कधीच या पदावरील व्यक्तीचा झाला नसेल”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते राज्यपालांकडे वेळोवेळी तक्रारी घेऊन जातात. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र या अधिकाराबरोबरचं काही प्रथा आणि पंरपराही लक्षात ठेवायला हव्यात. आपल्या राज्याला एक संस्कृती आहे. राज्यपाल आपल्या अभिभाषणातून राज्याने काय काम केले हे सांगणार होते. मात्र काही लोकांनी त्यांचे अभिभाषण होऊ दिले नाही. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाही. त्यांना थांबू दिले नाही. एवढा घोर अपमान क्वचितच झाला असेल…”असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
दाऊद इब्राहिम प्रकरणावरून विरोधकांवर साधला निशाणा
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम गँगशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने अधिवेशनात त्यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “दाऊदचा उल्लेख केला. तो तेवढ्या पुरता नव्हता. तो उल्लेख रोजच करत आलात आहात. काल फडणवीस तुम्ही कविता सादर केली तेच ते तेच ते पण ते तुम्ही महिनाभर केलं. भाजपकडून महिनाभर दाऊद एके दाऊद सुरु होतं. राज्यात सुरु असलेली चांगली कामे काही लोकांना दिसत नाहीत. काही लोकांना आरशामध्ये बघितल्यावरही भ्रष्टाचार दिसतो,” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजवर केली आहे.