घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री ठाकरेंचा पुन्हा लॉकडाऊनचा इशारा

मुख्यमंत्री ठाकरेंचा पुन्हा लॉकडाऊनचा इशारा

Subscribe

लोकांची कोरोनाबाबत अक्षम्य बेफिकिरी

कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येची दखल घेत राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे.

राज्यातल्या सर्वच शहरांमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. जणू काही कोरोना संपल्यागत सगळे वावरत आहेत. लोक मास्क घालत नसतील किंवा आरोग्यविषयक नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने अजिबात दयामाया न दाखवता दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल केल्याने राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णाचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. कोरोना संपला असे सगळे वागत असून परिणामतः आपल्याच घरातील ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात टाकतो आहोत, याची जाणीव ठाकरे यांनी करून दिली. ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या, असे त्यांनी सुचवले आहे. जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करा, असे ठाकरे यांनी सांगितले.

नियम डावलणार्‍यांवर कारवाई करा
गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढताना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरविले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या आणि इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमाविना होताना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत. मात्र, तिथेही नियमांचे पालन होताना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे.

- Advertisement -

…तर विवाह हॉल,सभागृहांचे परवाने रद्द
ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क आणि इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई करावी, असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको. हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र, नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -