सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी दुसरी घोषणा कौशल्य प्रशिक्षण संकुलाबाबत केली आहे. ‘उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्याचं शिक्षण कामगारांना देण्यासाठी कौशल्य विकास संकुलाची उभारणी करणार. या संकुलात इथल्या भूमिपुत्रांना प्रशिक्षण देण्याचं काम होईल’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो' चे आयोजन करण्यात आले आहे. pic.twitter.com/HB57BpN51X
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 9, 2020
‘आता ‘मेड इन इंडिया’ची भुरळ पडली पाहिजे’
‘जागतिक मंदी आहे. देशात मंदी आहे. पण मंदी आहे म्हणून रडत बसलो तर रडणारे कधी जगू शकत नाही. जो लढतो तो जगतो. महाराष्ट्र हा लढणाऱ्यांचा प्रदेश आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंच आहे. पण त्यानंतर त्याला चिंतामुक्त देखील करायचं आहे. शेती परावलंबी आहे. पावसावर अवलंबून आहे. आपले दोन घास टिकवण्याचं काम तो करतो. पण तेच घास टिकवणारा संपून गेला, तर आपल्याला ते दोन घास कुठून मिळणार? शेती आणि उद्योगाची सांगड घालता आली पाहिजे. शेतकरी जे पीक घेतो, त्याला आपल्याला उद्योग खात्याकडून बाजारपेठा उपलब्ध करून देता आली पाहिजे. आता मेड इन इंडियाची भुरळ जगाला पडली पाहिजे’, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.