घरताज्या घडामोडी'औरंगजेब काही सेक्युलर नव्हता', औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन!

‘औरंगजेब काही सेक्युलर नव्हता’, औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतर मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेसकडून नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याचं सांगत त्याला विरोध केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याला विरोध केला गेला होता. मात्र, असं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यावर अद्याप भूमिका मांडली नव्हती. अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं असून मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे आता सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून ठिणगी पडल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नाशिकमधल्या भाजपच्या दोन नेत्यांचा आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपचे माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी नामांतराच्या मुद्द्यावर विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. ‘मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर करणं यात आम्ही नवीन काहीही केलेलं नाही. जी आमची आधीपासूनची भूमिका होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आधीपासून मांडलं होतं, तेच आम्ही बोललो आहोत. आणि औरंगजेब हा काही सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यामध्ये असलेल्या ‘सेक्युलर’ शब्दात औरंगजेब बसत नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील नवाब मलिक यांनी नामांतराच्या मुद्द्याला पक्षाचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची नामांतरासाठी आग्रही भूमिका मांडल्यामुळे या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -