मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जन आशीर्वाद यात्रेवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. कशाला जनतेचे जीव घ्यायला जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ठाण्यात ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. का तर आम्हाला जनतेच्या आशीर्वाद घ्यायचे आहेत. कशाला आशीर्वाद…जनतेचे जीव धोक्यात घालायला, असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. या सगळ्या घाणेरड्या राजकारणापासून बाजूला राहून शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिकवण जागी ठेवली त्यासाठी त्यांचं कौतुक करतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.