घरमहाराष्ट्र२५ वर्षे उबवणी केंद्रे निर्माण केली, नको ती अंडी उबवली - उद्धव...

२५ वर्षे उबवणी केंद्रे निर्माण केली, नको ती अंडी उबवली – उद्धव ठाकरे

Subscribe

राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही 25 वर्षे उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचे काय झाले ते तुम्ही पाहत आहातच, असा टोला उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच दिवाळीनंतर फटाके फोडा पण धूर काढू नका, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मला यायला अडचण होती; पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभे राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला
शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरे सांगितले की खोटे? सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला, अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे आणि या संस्थांचे. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. ‘कुटुंब रंगलं काव्यात’ तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.

राजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितले पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणे योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावे आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोक आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

- Advertisement -

गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचे केंद्र बनेल, मुख्यमंत्र्यांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. बारामती राजकारणाचे केंद्र आहेच; पण शिक्षणाचेही केंद्र होणार आहे. इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात, असे त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -