सरकारच्या १०० दिवसापूर्तीनिमित्ताने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खासदारांना घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील’, असं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. मार्च दुसऱ्या आठवड्यात हा दौरा करणार असल्याचं समोर येतं आहे.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येला जाऊन भाजपाला आव्हान दिलं होत. त्यानंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आलं आणि राजकीय परिस्थिती बदलली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन दिलं होत. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर शिवतिर्थावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत अशी चर्चा सुरू होती. मात्र संजय राऊत यांनी आज ट्विट करून उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
हेही वाचा – शिवभोजनासाठी आधारकार्डाची गरज नाही – भुजबळ