मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना परिस्थिती, लोकल प्रवास, हॉटेल व्यावसायिकांना दिलासा या विषयांवर काय बोलणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. यामुळे कोरोना निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमका दाखवली होती. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिलही केले आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्यामुळे चाकरमान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच हॉटेल चालकांना निर्बंध शिथिलतेमध्ये सूट देण्यात आली नाही. यामुळे मुख्यमंत्री या वर्गाबाबत काही सूचना करणार का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याच्या बाबतीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (रविवार, दि. ८ ऑगस्ट) रात्री ८ वा. समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. pic.twitter.com/s32N8i8yNq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 8, 2021
राज्यातील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामध्ये निर्बंध शिथिल केले असले तरी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्बध शिथिल करण्याबाबत दबाव आणला जात आहे. राज्य सरकारने अजूनही मंदीर, हॉटेल, सार्वजनिक ठिकाणं, पर्यटन बंद ठेवलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की कोणत्या विषयावर भाष्य करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.