महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानाच्या पारा वर०-खाली होताना दिसत आहे. यात काही भागात थंडी वाढत असून तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या थंडीमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर थंडी वाढत आहे. यात राजधानी दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी पडली असून तिथे येलो अलर्ट जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत किमान तापमान 5 अंशावर पोहचले असून दृश्यमान्यता 50 मीटरपेक्षा कमी झाले आहे. यात पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यामुळे हवामान विभागाने औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भातील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात मुंबईतील तापमानातही घट होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याचा अंदाज असून 13 ते 14 जानेवारीदरम्यान मुंबईतील तापमान आणखी घटण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून थंडीची लाट कायम असून तापमानात घट होत आहे. काल परभणीचे तापमान 5.7 अंशावर होते. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटताना दिसतायत. यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही घटतेय. रात्री आणि पहाटे सर्वत्र थंडगार वारा सुटल्याने जिल्हा गारठला आहे.
धुळे जिल्ह्यातील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहचले असून दिवसभर वातावरणात गारठा जाणवतोय. वाढत्या थंडीमुळे प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील परिणाम जाणवतोय. गहू, हरभरा, कांदा पिकावर त्याचा परिणाम जाणवतो.
कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककर गारठले आहेत. यामुळे निफाडमध्ये थंडीचा पारा 5 तर नाशिकमध्ये 8 अंशांच्या खाली घसरला आहे. नागरिकांना अंगावर स्केटर किंवा गरम कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे कठीण होत आहे.