गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत झालेली घट पाहता महाविद्यालयेसुद्धा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु झाल्या असून, आता राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. महाविद्यालय सुरु करणार असल्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. कोरोनाची परिस्थिती पाहता शाळांप्रमाणे स्थानिक पातळीवरदेखील महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासन कोविडची परिस्थिती पाहून महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेणार आहेत.
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2022
महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ओमिक्रॉनचा आढावा घेऊन मुख्यमंत्री महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यावर उदय सामंत यांनी माहिती दिली होती.
महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 21, 2022