राज्यातील कॉलेज/महाविद्यालये येत्या २० ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील कॉलेज सुरु करण्यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे दोन लसीचे डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना कॉलेजमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयांकडून लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करण्यात यावेत अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील कॉलेज सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. राज्यातील कॉलेज २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यमंत्रिमंडळात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उदय सामंत यानी दिली आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीनुसार वर्ग भरवण्यात यावे अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
कॉलेज सुरु करण्याची नियामवली
महाविद्यालये ५० टक्के उपस्थितीनुसार सुरु करण्यात यावीत.
ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल तिथे स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने कॉलेज सुरु करता येईल.
वेगळ्या जिल्ह्यात वेगळी नियमावली तयार करण्याची मुभा असेल.
विद्यार्थ्यांनी दोन्ही लसीचे डोस घेतलेले असावेत, जर दोन्ही लसीचे डोस घेतले नसतील तर विशेष लसीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात यावे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरु ठेवावी का नाही हे सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणावर असेल.
वसतीगृह सुरु करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीरण पूर्ण होणे आवश्यक आहे.
हेही वाचा : अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर, कोणाला किती मदत ?